स्त्री-पुरुष असमानता (Gender Inequality)
लेखक – प्रज्ञा जयवंतराव चव्हाण
समाजामध्ये कोणकोणत्या प्रकारे आपणाला स्त्री-पुरुष असमानता दिसून येते हे आज आपण पाहत आहोत. आज विविध क्षेत्रांमध्ये स्त्री कार्यरत आहे. परंतु आजही स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये आपणाला समानता दिसून येत नाही. आज विविध क्षेत्रामध्ये स्त्री -पुरुष असमानता दिसून येते. या गोष्टी अगदी लहानपणापासून मुला–मुलींच्या मनावर बिंबविल्या जातात. व त्याचा परिणाम आपल्याला समाजातील तरुण वर्गातील व्यक्तींवर होताना दिसून येतो.
1. सामाजिक क्षेत्र :-
लैंगिक समानता :- लैंगिक समानता म्हणजे काय? लिंग आणि लिंग यातील फरक . पुरुष प्रधान संस्कृती भारतात पुरुषप्रधान संस्कृती आहे व या पुरुषप्रधान संस्कृतीने भारतातील स्त्रियांवर अनेक वर्षांपासून जाचक रूढी ,प्रथा, परंपरा यांच्या नावाखाली अन्याय ,अत्याचार केल्याचे दिसून येते. स्त्री ही केवळ उपभोगाची वस्तू आहे तिला स्वातंत्र्य विचार करण्याची मुभा नाही. अशा जाचक रूढी ,प्रथा ,परंपरा तिच्यावर लादल्या गेल्या आहेत. तसेच मुलगा हा वंशाचा दिवा व मुलगी ही परक्याचे धन अशी विचारसरणी असल्याचे आजही समाजामध्ये पहावयास मिळते त्यामुळे मुलीला शिक्षण व उच्च शिक्षणापासून वंचित ठेवले जाते. तसेच मुलगी आहे हे समजल्यास तिचा गर्भपात देखील केला जातो, मुलगी आहे म्हणून तिचा लहानपणापासून राग – राग व तिरस्कारही केला जातो.आजही आपण पाहतो की घरामध्ये देखील पुरुषी वर्चस्व दिसून येते. स्त्रीला दुय्यम समजले जाते. तिला शिक्षणापासून वंचित ठेवले जाते किंबहुना उच्च शिक्षण दिले जात नाही. तिच्या व्यक्तिमत्व विकासासाठी वाव दिला जात नाही .तिची घुसमट केली जाते.स्त्रीला कर्तव्य व जबाबदारीच्या ओझ्याखाली दाबून टाकले जाते. जसे की घरातील सर्व कामे करणे ,मुलांचे पालन पोषण करणे, घरातील वृद्ध व आजारी व्यक्तींची काळजी घेणे. ही सर्व तिचीच कामे आहेत व तिनेच ती केली पाहिजेत अशी समाजाने तिच्यावरती जाचक रूढी व परंपराच्या नावाखाली लादलेली कामे आहेत. त्याचप्रमाणे मूल न होणे याकरता देखील स्त्रीला दोषी ठरवले जाते तिला आवाज उठवता येत नाही. त्यामुळे ती वर्षानुवर्ष हे सहन करते. व याच गोष्टीचा वारसा ती तिच्या पुढच्या पिढीला देत राहते. आम्ही घेतलेल्या प्रशिक्षणात एका व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला या गोष्टींची जाणीव झाली की या जाचक प्रथा , परंपरा व रूढी थांबवण्यासाठी आपण जाणीव जागृती कार्यक्रम केली पाहिजे .मुलांप्रमाणे मुलींना देखील समान वागणूक दिली पाहिजे .मुलगा – मुलगी असा भेदभाव न करता ते देशाचे उद्याचे भावी नागरिक आहेत हे विचार त्यांच्यात रुजवले पाहिजेत. त्यांच्यात कर्तव्य ,जबाबदारी व अधिकारात समानता आणणे ही समाजाचा एक सुजाण नागरिक म्हणून आपली जबाबदारी आहे आजचे युवक -युवती ही उद्याचे चांगले नागरिक घडवण्यासाठी आपण आधुनिक काळात हे बदल घडवून आणणे गरजेचे आहे. ज्याप्रमाणे मुलीला घरातील सर्व कामे आली पाहिजे त्याप्रमाणे मुलाला देखील ती कामे येणे गरजेचे आहे. प्रशिक्षणा दरम्यान आम्हाला याबाबत दोन व्हिडिओ दाखवण्यात आले त्यामधून असे दिसून आले की मुलीला घरातील सर्व कामे आली पाहिजे हे महत्त्वाचे समजले जाते. दुसऱ्या व्हिडिओत असे दिसून आली की पळण्याच्या स्पर्धेमध्ये मुलगी प्रथम आली व मुलगा द्वितीय आला. तेव्हा मुलाच्या वडिलांनी त्याचे कौतुक न करता तू एका मुलीकडून हरला हे त्या मुलाच्या मनावर बिंबवण्यात आले. अप्रत्यक्षपणे त्या लहान मुलाला या गोष्टीची जाणीव करून देण्यात आली. एक पालक म्हणून आपण त्याच्या मनावर काय बिंबवली पाहिजे ही समजणे गरजेचे आहे .तेव्हाच समाजात लैंगिक भेदभाव नाहीसा होऊन समानता निर्माण होण्यास मदत होईल. निसर्गाने स्त्री व पुरुष यांच्यात अशा दोन विभागात माणसाची विभागणी जरी केली असली तरी माणसाने मात्र या दोघात भेदभाव करत असल्याचे दिसून येत आहे. हे चित्र बदलण्यासाठी आपल्याला संविधानाने दिलेली मूलभूत हक्क व कायदे यांच्या संदर्भामध्ये जाणीव जागृती घडवून आणणे महत्त्वाचे आहे.
2. कामाच्या ठिकाणी दिसून येणारा भेदभाव :-
कामाच्या ठिकाणी स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये असमानता असल्याचे दिसून येते. यामध्ये वेतन व संधी यांचे विभाजन करत असता असे दिसून येते की , कामाचे तास समान असतात व वेतन मात्र पुरुषांच्या तुलनेने स्त्रीला कमी वेतन दिले जाते . तिला कामामधील उच्च पदावरील किंवा बढतीची संधी नाकारली जाते. तसेच काही कामाच्या ठिकाणी विवाहित व तिला आपत्य असल्यास स्त्रीला नोकरी दिली जात नाही. तिची पात्रता असताना देखील तिला संधी दिली जात नाही.
3. राजकीय क्षेत्रात संधी नाही :-
राजकीय क्षेत्रामध्ये देखील स्त्रियांचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येते. विधानसभा,राज्यसभा यामध्ये देखील स्त्रियांची संख्या पुरुषांच्या तुलनेने कमी असल्याचे पहावयास मिळते. संविधानाने आपणा सर्वांना दिलेल्या मूलभूत अधिकारानुसार समान न्याय, समान संधी, समान वेतन, समान अधिकार याबाबत अजूनही लोकांमध्ये जाणीवजागृती व सुधारणा घडवून आणणे गरजेचे आहे. स्त्रियांचे राजकीय क्षेत्रामध्ये नेतृत्व करण्याचे प्रमाण वाढविले पाहिजे.
4. आर्थिक क्षेत्र :-
स्त्री ही आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे गरजेचे आहे. स्त्री ही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असते, ती कधीही डगमगत नाही .परंतु, कोविड काळामध्ये अनेक महिलांना नोकरी गमवावी लागली आहे. पुरुषांच्या तुलनेने महिलांचे नोकरी सोडण्याचे प्रमाण हे या काळामध्ये जास्त होते. नोकरी व व्यवसाय यामध्ये स्त्रियांचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येते. याला कारणीभूत आपली पुरुषप्रधान संस्कृती आहे. सर्व कर्तव्य व जबाबदाऱ्या या घरातील महिलेवर पडल्यामुळे तिला तिची स्वतःची ओळख निर्माण करण्यास ,नोकरी व व्यवसाय करण्यास वाव दिला जात नाही. परिणामी तिची प्रगती होत नाही, तिला निर्णय घेता येत नाही, हतबल होते ,दुसऱ्यावर अवलंबून राहते, स्वतःचे स्वातंत्र्य गमावून बसते ,स्वतःचे अस्तित्व देखील गमावले जाते. कारण ती आर्थिक दृष्ट्या कुमकुवत असते. असे होऊ नये याकरिता घरातील स्त्री व पुरुष दोघांनीही कर्तव्य व जबाबदारी समानपणे पार पाडणे गरजेचे आहे. नोकरी व व्यवसाय करून स्वतःच्या पायावर उभे राहणे गरजेचे आहे.
स्त्री पुरुष समानता आणण्यासाठी आपण काय करू शकतो :-
आत्ताच्या युवक युवती मध्ये याबाबत जाणीव जागृती करू शकतो, रस्त्याच्याकडेने आपण या संदर्भामध्ये पोस्टर्स लावू शकतो, रस्त्यावरती स्ट्रीट प्ले करू शकतो, सोशल मीडियाचा वापर करून आपण अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवून याबाबत जाणीव जागृती निर्माण करू शकतो. वर्षानुवर्ष ज्या जाचक रूढी आणि परंपरा स्त्रीवर लादल्या गेल्या आहेत. त्या रूढी व परंपरांचा त्याग करून आपण आधुनिक विचारसरणीने विचार करण्यास समाजाला प्रवृत्त केले पाहिजे. आपण आपल्यापासून सुरुवात करून समाज परिवर्तन घडवण्याचा प्रयत्न करू शकतो. आपल्या घरातील आई, बहीण, मुलगी ,वडील ,भाऊ व मुलगा हे एक जुटीने काम करून व समानतेने राहून एक आदर्श समाजापुढे निर्माण करू शकतील. शैक्षणिक क्षेत्रामध्ये याबाबत अधिक जागृती निर्माण करू शकतो. ज्यामुळे स्त्री पुरुष समानता निर्माण होण्यास मदत होईल व असमानतेची दरी नाहीशी होईल.